महाराष्ट्राला पुरेशा लसी मिळणार नसतील तर.., मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र

राज्यातील कोरोना परिस्थीतीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहलं आहे. या पत्रातून राज ठाकरेंनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करु देण्याची प्रमुख मागणी केली आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा आलेख वाढत आहे. त्यात राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेला लसीचा तुटवडा याकडे राज ठाकरे यांनी पंतप्रधानांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच, या पत्रातून पंतप्रधानांकडे काही मागण्याही केल्या आहेत.

'महाराष्ट्रला कोरोना साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवानं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात आहेत. संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील स्थिती सर्वात बिकट झाली आहे. कोरोनाची लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, लॉकडाऊन जाहीर करणं महाराष्ट्राला परवडणारे नाही', असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.

कोरोना संसर्गाला तोंड द्यायचं असेल तर १०० टक्के लसीकरण करणं महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे. म्हणूनच राज्यातील सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचं लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. हे साध्य करण्यासाठी विशेषतः कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ हवी', असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

राज ठाकरेंच्या केंद्राकडे प्रमुख मागण्या

  • महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्या.
  • राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात.
  • सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी.
  • लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी.
  • कोविड रोगाचा उपचार करमअयासाठी लागणारी आवश्यक औषधे उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.
पुढील बातमी
इतर बातम्या