'शहिदांच्या वारसांना नोकरी द्या'

मुंबई - उरी दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या वारसांना मुंबई पालिकेत नोकरी द्यावी अशी मागणी पालिकेच्या महासभेत मनसे गटनेता संदिप देशपांडे यांनी केली. काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेनेही ही मागणी उचलून धरली. पाकिस्तानला आता चोख उत्तर देण्याची वेळ आल्याचे म्हणत सर्व पक्षांनी याचे राजकारण न करता एकत्र येऊन अशा हल्ल्याचा सामना करण्याची भावना यावेळी व्यक्त केली.

महासभेत उरी दहशतवादी हल्ल्याचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी संदीप देशपांडे यांच्यासह भाजपचे मनोज कोटक, शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांच्यासह अन्य पक्षांनीही महाराष्ट्रातील उरी हल्ल्यातील शहिदांच्या वारसांना पालिकेच्या नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली. उरीच्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या 18 जवानांपैकी चार वीर शहिद जवान महाराष्ट्रातील आहेत. लान्स नायक चंद्रकांत गलांडे, शिपाई संदिप ठोक, शिपाई विकास उईके आणि विकास कुडमेथे अशी या वीर शहिदांची नावे आहे. सातारा, नाशिक, अमरावती आणि यवतमाळ येथील हे रहिवासी होते.

पुढील बातमी
इतर बातम्या