मनसेकडून ३ मे म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी होणारी महाआरती रद्द करण्यात आली आहे. राज्यभरात मनसेकडून महाआरती होणार होती. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना महाआरती रद्द करण्यात येत असल्याचं ट्विटरद्वारे सांगितलं आहे.
ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणाले आहेत की, “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे आपल्यासमोर मांडेन.”
दरम्यान, महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली यावेळी मशिदींवर लावलेले लाऊडस्पीकर हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ तारखेचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तर रविवारी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे.
“सगळ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे. ते भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले पाहिजेत,” असं मत राज ठाकरे यांनी रविवारच्या सभेत व्यक्त केलं. मात्र, आधी मशिदींवरील भोंगे उतरतील आणि मगच मंदिरांवरील भोंगे उतरवू, असंही त्यांनी पुढे नमूद केलं.
हेही वाचा