देशात दलित, अल्पसंख्यांक आणि महिलांवर वाढते अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी याला जबाबदार असलेल्या भाजप सरकारविरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रविवार २९ एप्रिल २०१८ रोजी, दिल्लीतील रामलीला मैदान येथे ‘जनआक्रोश रॅली’चं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीसाठी मुंबईतून तब्बल १२००च्यावर कार्यकर्ते दिल्लीला जाणार असून ज्या ट्रेनमधून कार्यकर्ते रवाना होणार आहेत. त्या ट्रेनचं नाव राजीव गांधी सुपरफास्ट एक्स्प्रेस असं ठेवलं आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश रॅलीत सामील होण्यासाठी मुंबई काँग्रेसचे मुंबईतील तळागाळातील १२०० च्यावर कार्यकर्ते संपूर्ण ट्रेन भरून दिल्लीला रवाना होतील. या ट्रेनला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि ही ट्रेन शुक्रवारी २७ एप्रिल २०१८ रोजी रात्री ११ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून रविवार २९ एप्रिल २०१८ रोजी सकाळी दिल्लीला पोहचणार आहे.
या ट्रेनच्या प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण ट्रेन भरून मुंबईतील काँग्रेसचे १२०० च्या वर कार्यकते दिल्लीमध्ये एका आंदोलनाला रवाना होणार आहेत. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने या ट्रेनचं नाव ‘राजीव गांधी सुपरफास्ट एक्सप्रेस’ असं ठेवलं आहे. राहुल गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी देशभरातून लाखोंचे कार्यकर्ते या जनआक्रोश रॅलीमध्ये सामील होणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.