'मुंबईत 100 टक्के नालेसफाई कधीच होऊ शकत नाही. नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवडणुकीच्या वेळी प्रचारात केला गेला होता. पण भ्रष्टाचार झाल्याचे कधीच सिद्ध झाले नाही. केवळ निवडणुकीपुरते हे आरोप केले जातात', असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नालेसफाई दौऱ्याच्यावेळी केले.
नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते. पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतर नालेसफाई सुरूच असते. त्यामुळे नालेसफाई पूर्ण झाली हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. ही सातत्याने चालू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पावसाच्या पूर्वी जी कामे करायची आहेत ती पूर्ण केले जातील, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
मात्र उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे इतकी वर्षे नालेसफाई पूर्ण झाली, असा दावा महापालिका प्रशासन आणि नेत्यांकडून केला जायचा तो चुकीचा होता की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नालेसफाईचा दौरा केल्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार बुधवारी पश्चिम उपनगरामध्ये नालेसफाईचा दौरा करणार आहेत. याआधी 28 एप्रिलला आशिष शेलार यांनी नालेसफाईचा दौरा केला होता. नालेसफाईमुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजपामध्ये वाकयुद्ध सुरू होणार हे नक्की.