नारायण राणे यांच्या संघर्ष यात्रेचं काय होणार?

विरोधकांची 'संघर्ष यात्रा' फसली असं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा अाहेर दिला. हीच 'संघर्षयात्रा' जर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लगेच काढली असती तर त्याचा कदाचित फायदा झाला असता, असं निरीक्षण नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईत नोंदवलं. आपल्याकडे 'संघर्षयात्रेची' कोणतीही जबाबदारी सोपवली गेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

आपल्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याच्या सुरू असलेल्या चर्चेत तथ्य नसल्याचा आणि भाजपातून आपल्याला ऑफर असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. मी भाजपात जाणार, या बातम्या प्रसारमाध्यमांनी पसरवल्या. भाजपामध्ये जाण्याविषयी आपण कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं, याची आठवण करून देत त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्याशी दिल्लीत सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती दिली. शिवसेनेवर प्रहार करण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. 

राणे यांच्या राजकीय भवितव्याची राजकारणात चर्चा सुरू असताना राणेंनी मात्र 2019 मध्ये शिवसेनेचा झेंडा निघून जाईल आणि पक्षनेतृ्त्वाच्या हातात फक्त दांडा राहील, असं भाकित केलं. आपण भाजपामध्ये गेलो तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल म्हणते. त्यांनी बाहेर पडून दाखवावं, असं सांगणाऱ्या राणे यांनी शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरीही शिवसेनेचे 17 आमदार सत्तेतच राहतील, म्हणजेच भाजपाला साथ देतील, असा दावा केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या