भागधारक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अॅग्रो लिमिटेड कंपनीवर ‘सेबी’ने कारवाई केली आहे. कंपनीचे संचालक आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह त्यांच्या पत्नी स्मिता आणि इतर १० संचालकांना भांडवली बाजारात व्यवहार करण्यावर ‘सेबी’ने निर्बंध आणले आहेत.
सहकारमंत्री देशमुख यांचे फक्त बँकच नाही तर त्यांचे इतर व्यवसायदेखील आहेत. त्यापैकीच लोकमंगल अॅग्रो लिमिटेड हा साखर कारखानाही आहे. याद्वारे देशमुख यांनी २००९-१० ते २०११-१२ या काळात सोलापूर जिल्ह्यातील ४७३९ शेतकऱ्यांना ७२.७२ लाख समभाग विकले होते. प्रत्येकी १० रुपयांनुसार त्यापोटी शेतकऱ्यांनी ७२.७२ कोटी रुपये कंपनीला दिले. पण भागधारकांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे भागधारक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) लोकमंगल अॅग्रोला नोटीस पाठवली होती.
दुष्काळामुळे ऊस उत्पादन कमी झाले आणि कारखाना संकटात आला असल्याचं कंपनीने सांगितलं होतं. वास्तवात संचालकांनी शेतकऱ्यांच्या पैशांनी जमिनी खरेदी करत इमारतीही उभ्या केल्या. त्या सगळ्याची किंमत आज १०८ कोटी रुपयांच्या घरात आहे. ही भागधारकांची फसवणूक आहे. कंपनीने निधीचा गैरवापर केला, असं स्पष्ट करत ‘सेबी’ने कारवाई केली आहे.
आता संचालकांना परवानगीखेरीज भांडवली बाजारात कंपनीच्या नावे अथवा वैयक्तिक स्वरुपात व्यवहार करता येणार नाहीत. तसेच सर्व डी-मॅट खाती, समभाग आणि गुंतवणुकीची माहिती ‘सेबी’कडे जमा करावी लागेल.
शेतकऱ्यांचे १२२ कोटी परत करण्यासाठी ‘सेबी’ने ‘फॉर्म्युला’ मांडला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना १० टक्के व्याजदाराने १२२.८६ कोटी रुपये कंपनीकडून परत मिळू शकतात. तर ६ टक्के व्याजदरानुसार किमान १०२.८० कोटी रुपये परत मिळू शकतील . मात्र याबाबतचे आतापर्यंत कोणतंही निर्देश दिलेलं नाही.