आदित्य ठाकरेंच्या नावाने रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल, राहुल शेवाळेंचा आरोप

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केलाय.

लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी हा गंभीर आरोप केलाय. परंतु, शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, असे आव्हान कायंदे यांनी दिलं आहे.

"लोकसभेत ड्रग्ज या विषयावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत अनेकांनी भाग घेतला. माझ्या भाषणाआधी चार ते पाच खासदारांनी सुशांतच्या केसचा उल्लेख केला. तोच विषय मी सभागृहात उपस्थित केला. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांनी तपास केला. परंतु, या तिघांच्या तपासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. ड्रग्जसंबंधात रियाची चौकशी करण्यात आली होती. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला जे कॉल आले होते, त्यासंदर्भात बिहार पोलिांच्या तपासात उल्लेख आहे. रियाला ते कॉल एयू या नावाने आले होते, असे बिहार पोलिसांनी म्हटले होते. परंतु, मुंबई पोलिसांनी एयू म्हणजे रियाची मैत्रिण अनन्या उधास असल्याचं महटलं होतं. मात्र, एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. सीबीआयने याबाबतची माहिती अद्याप लोकांसमोर आणलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या तपासाची माहिती जनतेला मिळावी म्हणून मी हा मुद्दा आज लोकसभेत उपस्थित केला, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.


हेही वाचा

"उठ दुपारी अन् घे सुपारी" असा राज ठाकरेंचा कार्यक्रम, सुषमा अंधारेंची टीका

पुढील बातमी
इतर बातम्या