युतीसाठी आता महाराष्ट्र व्यासपीठ आहे. एका युतीची ही पुढली गोष्ट असून अवघा देश याकडे बघत आहेत, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपाची युती ही अभेद्य असून ती कधी तुटणार नाही याची ग्वाही दिली. शिवसेनेचा ५३ वा वर्धापनदिन सोहळा षण्मुखानंद सभागृह येथे बुधवारी पार पडला. यावेळी उद्धव बोलत होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
'आपल्यात सगळं समसमान असलं पाहिजे', असे सूचक वक्तव्य करताना राज्यातील सत्तेत शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष समान वाटेकरी असायला हवेत, अशी अप्रत्यक्ष मागणीही उद्धव यांनी केली.
युतीमध्ये मधल्या काळात आलेला दुरावा आता नाहीसा झाला आहे. एकमेकांशी भांडून आता माती होऊन द्यायची नाही. आपले जे वाद होते ते मूलभूत विषयाबद्दल होते. तुमच्याही मनात भगवा आमच्याही मनात भगवा आहे. त्यामुळे ते वाद आता संपले असल्याची ग्वाही उद्धव यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्या नालायकांचा पराभव झाला. सावरकरांना डरपोक म्हणणारे पंतप्रधान होणार का अशा शब्दात उद्धव यांनी यावेळी विरोधकांवर टीका केली.
आमची युती अभेद्य आहे. आमचंही ठरलं आहे. सर्व विषयांचा विचार करून युती ठरली आहे. त्यामुळे भविष्यात काही प्रश्न, चिंता निर्माण होणार नाही, असंही यावेळी उद्धव यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांना वर्धापनदिन कार्यक्रमात बोलवल्याबद्दल होत असलेल्या चर्चांचा समाचार घेताना उदधव म्हणाले की, मित्रपक्षाचा नेता आणि माझा वैयक्तिक मित्र याला कार्यक्रमाला बोलावलं तर दुसऱ्यांच्या पोटात दुखाचे काय कारण. भाजपाच्या वर्धापनदिनी कार्यक्रमातही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बोलावलं होतं. ती परंपरा मध्ये खंडीत झाली होती. ती आता पुन्हा सुरू झालीय.
हेही वाचा -
मुख्यमंत्री कोण? ही तर मीडियाची चर्चा- देवेंद्र फडणवीस