महाविकास आघाडी सरकारमधील बहुप्रतिक्षीत खातेवाटपाला अखेर गुरूवारी मुहूर्त मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रीमंडळातील ६ मंत्र्यांवर सर्व खात्यांची जबाबदारी या खातेवाटपाच्या माध्यमातून सोपवली आहे. त्यामुळे हे मंत्रीमंडळ जम्बो जरी नसलं, तरी वजनदार नक्कीच म्हणावं लागेल. या खातेवाटपाला राज्यपालांनी देखील मंजुरी दिली आहे. खाते वाटपावरून विधेयकांनी अधिवेशनात गदारोळ करू नये म्हणून हे खाते वाटप करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन तोंडावर येऊन ठेपलेलं असतानाही नव्या सरकारचं खातेवाटप रेंगाळल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर तिखट शब्दांत टीका करण्यात येत होती. मंत्र्यांमध्ये खातेवाटपच न झाल्याने येणाऱ्या अधिवेशनात विरोधकांनी कुणाला प्रश्न विचारायचे? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने झटपट हालचाली करत खातेवाटप नक्की केलं. त्यानुसार एकूण ६ जणांच्या मंत्रीमंडळावर सर्व खात्यांचा भार सोपवण्यात आला आहे. तर हिवाळी अधिवेशनानंतर नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अपेक्षित आहे.
खातेवाटप पुढीलप्रमाणे-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांतील प्रत्येकी २ अशा एकूण ६ नेत्यांनी शिवाजी पार्क मैदानावरील भव्यदिव्य सोहळ्यात मंत्रीपदाची शपथ घेतली होती.