मुंबई - भाजपाच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या महापौरांच्या बाजूने मतदान केले असले तरी अधिवेशनात मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. विरोधकांच्या विरोधात शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी सूर मिळवल्याचे पहायला मिळत आहे.
या गोंधळामुळे विधान सभेतील कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. बुधवारी विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मात्र शिवसेनेच्या आमदारांनी घोषणाबाजी केली नसल्याचा दावा केला. तर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना शेतकरी कर्जमाफीसाठीचे समर्थन करत असल्याचे सांगितले. तसेच कर्ज माफीसाठी शिवसेना पाठपुरावा करत राहणार असल्याचेही रामदास कदम यांनी सांगितले.