मुंबई - महापालिकेच्या प्रभाग समित्या शिवसेना भाजपाने आपसात वाटून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपले जिथे बहुमत आहेत तिथेच प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढवली जाईल असे सांगणाऱ्या भाजपाने शिवसेनेबरोबर छुपी युती करत 17 प्रभाग समित्या वाटून घेतल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला 9 आणि भाजपाला 8 प्रभाग समित्या वाटून घेत काँग्रेसच्या वाट्याला जाणाऱ्या एक-दोन प्रभाग समित्याही हिरावून घेण्याचा डाव आखला जात आहे.
महापालिकेच्या 17 प्रभाग समित्यांपैकी 8 प्रभाग समित्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहे. यातील 'अ, ब, आणि ई' प्रभाग समिती वगळता कुठेही काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही. या प्रभाग समितीत काँग्रेसचे 4 आणि शिवसेना-भाजपाचे प्रत्येकी तीन, आभासेचा एक आणि सपाचा एक अशाप्रकारे संख्याबळ आहे. याठिकाणी अभासेच्या गीता गवळी यांनी भाजपाच्यावतीने आणि काँग्रेसच्यावतीने जावेद जुनेजा यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे.
शिवसेना आणि भाजपाने प्रभाग समिती वाटून घेण्याचा निर्णय आशिष शेलार , मिलिंद नार्वेकर यशवंत जाधव, मनोज कोटक आदींनी बैठक घेऊन घेतला असल्याचे बोलले जात आहे. सभागृहनेता यशवंत जाधव यांनी जिथे भाजपाला गरज असेल तर मतदान करू असे संकेतही दिले आहेत.