सरकारच्या तीन वर्षांचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांमध्ये राज्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यांची भूमिका आणि ध्येय चांगली आहेत, असं म्हणत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. त्यांच्या कामामुळेच काँग्रेसचे अनेक आमदार देखील मुख्यमंत्र्यांना खासगीत चांगलंच म्हणतात, अशा आमदारांची मी यादीही देऊ शकतो, असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.
सरकार चुकत असेल तर सरकारमध्ये असणाऱ्या शिवसेनेने रस्त्यावर उतरून चुका दाखवून दिल्या पाहिजेत. पण, शिवसेना फक्त घाणेरडं राजकारण करत असल्याचं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली.
राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. मी अजून काँग्रेसमध्ये असलो, तरी केवळ शरीराने आहे, मनाने नाही. त्यामुळे राज्यात भविष्यात वेळ आलीच, तर मनसेसोबत जायला हरकत काय? असे म्हणत नितेश राणे यांनी राज ठाकरे यांचं फेरीवाल्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं. राज ठाकरे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. शिवसेना त्यांच्या नेतृत्वाखाली असती, तर शिवसनेती ताकद अजून वाढली असती असं वक्तव्य देखील त्यांनी केलं.