स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक संघ सभागृहाच्या फलकावर फासलं काळं

कर्नाटक सरकारने बेळगावासह सीमाभागात जय महाराष्ट्र म्हणण्यास बंदी घातली आहे. या महाराष्ट्रद्वेष्ट्या कर्नाटक सरकारच्या विरोधात मुंबई, ठाण्यात वातावरण तापले आहे. माटुंगा येथील कर्नाटक संघ सभागृहाच्या फलकावर काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे.

महाराष्ट्र या देशाचाच भाग असून, कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी बांधवांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी संघटनेने दिली आहे. 'बेळगावसह सीमा भागांत महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांना यापुढे 'जय महाराष्ट्र' हे शब्द उच्चारण्यावर बंदी घालू ' अशी भाषा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी वापरली होती.

त्याला प्रत्युत्तर म्हणून मुंबईसह अनेक भागात कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येत आहे. ठाण्यातही मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कर्नाटक राज्य परिवहनच्या बसवर ठळक अक्षरांत 'जय महाराष्ट्र' हे शब्द लिहून त्या बस कर्नाटकला रवाना केल्या आहेत. 'महाराष्ट्रद्वेष यापुढे खपवून घेतला जाणार नाही', असा इशारा मनसेने दिला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या