भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत एकमेकांच्या मांडीला मांडी खेटून बसलेले असले तरी या दोघांमध्ये आलबेल नसल्याचं अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. या दोन्ही पक्षांची स्थिती म्हणजे 'तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना' अशी झाली आहे. हे पुन्हा एकदा सांगण्याचं कारण म्हणजे राष्ट्रपतिपदावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा सुरू झालेली धुसफूस.
हो, नाही करता करता शिवसेनेने राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी कोविंद यांना पाठिंबा दिला असला तरी शिवसेनेच्या मनात त्यांच्या उमेदवारीबद्दल अजूनही नाराजी दिसून येत आहे.
राज्यात मध्यावधी निवडणुका घेतल्याच, तर शिवसैनिक वणव्यासारखा पेटून उठेल. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवाच, तुमच्या छाताडावर भगवा फडकवू, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेच्या 51 व्या वर्धापनदिनी भाजपाला दिलं होतं.
परंतु उद्धव यांनी भाजपाच्या छाताडावर बसण्याची भाषा केल्यानंतर शिवसेनेच्याच छाताडावर बसण्याचे डावपेच आखण्यास भाजपाने सुरूवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपाने 2019 च्या निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस नव्हे, तर शिवसेना पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून, लोकसभा निवडणूक शिवसेनेविरोधात लढवण्याचे आदेश खुद्द भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपा नेत्यांना दिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 540 जागा निवडून आणण्याचे लक्ष भाजपाने ठेवले असून, सर्वांना 100 टक्के प्रयत्न करावाच लागणार असल्याच्या सूचनाही अमित शाह यांनी मुंबईच्या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी भाजपाच्या सर्व आमदार, खासदारांनी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहचण्याचा आदेशच शाह यांनी दिला आहे.
आता तर खुद्द भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच शिवसेनेला पहिल्या क्रमांकाचा शत्रू मानल्याने पुढे शिवसेना-भाजपाच्या नव्या वादाचा अंक पहावा लागणार हेही तितकंच खरं.