देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री कोण होते हे जाणून घेण्यासाठी एका ज्येष्ठ पत्रकारानं ट्विटर वर जनमत चाचणी घेतली होती.
यात सर्वाधिक म्हणजेच ६२ टक्क्यांहून अधिक मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत. सध्या शिवसेना समर्थकांकडून या पोलचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून कोरोनाच्या कालावधीमध्ये सर्वात चांगल्या पद्धतीनं काम करणारे देशातील मुख्यमंत्री कोण असा ट्विटर पोल ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी घेतला होता.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीमध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांनी सर्वोत्तम नियोजन केले?, असा प्रश्न विचारत चावला यांनी दोन पोल घेतले होते. एका पोलला चारच पर्याय देता येत असल्यामुळे त्यांनी दोन पोल घेत आठ मुख्यमंत्र्यांचे पर्याय दिले होते.
दोन लाख ६७ हजार २४८ जणांनी पहिल्या पोलमध्ये आपलं मत नोंदवलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यापैकी ६२.५ टक्के मतं मिळाली. म्हणजेच उद्धव ठाकरे यांना दोन लाख ६७ हजार २४८ जणांपैकी एक लाख ६७ हजार ३० मतं मिळाली.
त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ३१.६ टक्के, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ४.६ टक्के आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना १.३ टक्के मत मिळाली. म्हणजेच योगी यांना एकूण ८४ हजार ४५० मते मिळाली. केजरीवाल यांना १२ हजार २९३ तर विजयन यांना ३ हजार ४७४ मतं मिळाली.
दुसऱ्या पोलममध्ये एकूण २ लाख ३४ हजार २६१ जणांनी आपलं मत नोंदवलं. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच ४९ टक्के मतं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मिळाली. त्या खालोखाल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना ४८.५ टक्के मतं मिळाली.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या वाट्याला १.७ तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना केवळ ०.५ टक्के मते मिळाली. म्हणजेच शिवराजसिंह चौहान यांना १ लाख १४ हजार ७८८ मतं मिळाली. त्या खालोखाल पटनायक यांना १ लाख १३ हजार ६१६ मते, तर अमरिंदर सिंग यांना ३ हजार ९८२ मते मिळाली.
हेही वाचा