उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात

मुलुंड - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलुंडमध्ये सभा घेतली. मुलुंड पूर्वेकडील शिवसेना शाखा क्रमांक 105 जवळ रविवारी ही सभा घेतली गेली. या सभेत उद्धव यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. नोटाबंदीमुळे भारताचा आर्थिक विकास होणार का? असा सवाल उद्धव यांनी या वेळी विचारला. तसंच जागा जास्त दिल्या तर पारदर्शकता आणि नाही दिल्या तर अपारदर्शकता, असा आरोप करत उद्धव यांनी भाजपावर टीका केली.

भाजपाने आरोप करण्यापूर्वी स्वत: पारदर्शक किती आहे ते बघा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपावर पलटवार केला आहे. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सांगितले की बंगारू लक्ष्मण एक लाख रुपयांची लाच घेत होते, इतक्या खालच्या पातळीला तुमचा अध्यक्ष गेला. तुम्हाला कसली पारदर्शकता पाहिजे.

नोटाबंदीमुळे फटक्यात लाखो लोक बेरोजगार झाले. तसंच डम्पिंग ग्राउंडसाठी मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि केंद्र सरकारने मुंबई महानगरपालिकेला पारदर्शकतेच्या मद्द्यावरून दिलेलं प्रशस्तीपत्रही उद्धव ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं. संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेऊ, अशी शपथ हुतात्मा चौकामध्ये जाऊन घ्या असा सल्लाही भाजपाला त्यांनी या वेळी दिला. बंडखोरी करून गेलेल्यांना मुलुंडकर त्यांची जागा दाखवतील असं बोलून प्रभाकर शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. या आरोप प्रत्यारोपांमुळे यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार हे निश्चित.

पुढील बातमी
इतर बातम्या