दिल्लीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अन्न महोत्सवामध्ये खिचडीला राष्ट्रीय अन्नाचा दर्जा दिला जाणार असे वृत्त प्रसारित झाले होते. यामध्ये अन्न मंत्रालयाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरीही दिल्याची चर्चा होती. पण या बातमीवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये भलतीच 'खिचडी' शिजू लागली आहे! आणि ही खिचडी इतकी करपली, की अन्न मंत्रालयाच्या मंत्री हरसिमरत कौर यांना ट्विट करून थेट खिचडीला राष्ट्रीय अन्नाचा दर्जा देण्याचा कोणताही विचार नसल्याचं जाहीर करावं लागलं.
राजधानी दिल्लीमध्ये येत्या 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय खाद्य महोत्सव भरणार आहे. यावेळी तब्बल 1 हजार लीटर क्षमता असलेल्या कढईमध्ये सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर 800 किलो खिचडी शिजवून विक्रम करणार आहेत. याचवेळी खिचडीला राष्ट्रीय अन्नाचा दर्जा दिल्याची घोषणा होणार.
हे वृत्त प्रसारित होताच ट्विटर-फेसबुकपासून थेट राजकीय पटलापर्यंत सगळीकडेच चर्चा सुरु झाल्या. ट्विटरवर अनेकांनी या निर्णयाला ट्रोल करायला सुरुवात केली. काहींनी या निर्णयाचा निषेध केला, तर काहींनी खिल्ली उडवली.
सत्ताधाऱ्यांनी ही 'खिचडी' कितीही टेस्टी बनवण्याचा प्रयत्न केला, तरी तिचा ठसका विरोधकांना लागला नसता, तरच नवल! शेवटी तेच झालं. काही विरोधकांनी 'सरकार आता लोकांनी काय खावं हेही सांगू लागलं आहे' अशा पद्धतीने या निर्णयाचा समाचार घेतला.
मुळात भारतासारळ्या वैविध्यपूर्ण आणि अनेक प्रकारच्या जेवणाच्या पद्धती असलेल्या देशामध्ये एकच कोणतातरी पदार्थ राष्ट्रीय खाद्य म्हणून जाहीर करणं अनाकलनीय होतं. त्यात ट्विटरवर सरकारच्या या 'संभाव्य' निर्णयावर भरपूर ट्रोलिंग झालं. शिवाय विरोधी बाकावरूनही निषेधाचा सूर ऐकू येऊ लागला. त्यामुळे शेवटी अन्न मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी ट्विट करून असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं जाहीर केलं आहे.
आता सरकारी निर्णयाची प्रसारित झालेली बातमी, त्यावर ट्विटरवर झालेलं प्रचंड ट्रोलिंग आणि नाराजी, विरोधकांनी केलेला विरोध आणि त्यावर मंत्र्यांचं खुलासा करणारं ट्विट, या सगळ्यात खिचडीचा फक्त विक्रम होणार असून ती राष्ट्रीय खाद्य होणार नसल्याचं सिद्ध झालं आहे. पण खरंच तसा काही निर्णय झाला नव्हता का? की झालेला निर्णय मागे घ्यावा लागला? नक्की पडद्यामागे कोणती 'खिचडी' शिजली? अशी शंका घ्यायला पुरेसा वाव आहे!
हेही वाचा