स्वराज्य फाऊंडेशनकडून पुढील १० दिवस मुंबईत मोफत जेवण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

काळाचौकी इथल्या स्वराज्य प्रतिष्ठाननं पुढाकार घेत पुढील १० दिवस सर्वसामान्य गरजू नागरिकांसाठी मोफत जेवण उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

मागच्या लॉकडाऊनमध्ये अनेकजणांची उपासमार झाली. भुकेमुळे अनेकांचे प्राण देखील गेले होते. हीच बाब लक्षात घेत काळाचौकी इथल्या स्वराज्य प्रतिष्ठानं पुढाकार घेत आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी दुपारच्या जेवणाची सोय केली आहे. 'भूक म्हणजे काय आम्ही जाणतो' आशा आशयाचं एक पोस्टर त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे.

याबाबत बोलताना स्वराज्य फाऊंडेशनचे काळाचौकी इथे राहणारे संस्थापक अध्यक्ष उदय पवार म्हणाले की, "कडक निर्बंधामुळे हातावर पोट असणारे टॅक्सी ड्रायव्हर, छोटे व्यावसायिक, कामगार, रिक्षा चालक यांची उपासमार होण्याची शक्यता आहे. मागील टाळेबंदीत अन्नधान्य वाटणारे भरपूर होते, परंतु आता मात्र ही संख्या कमी आहे. त्यामुळे या लहान कष्टकरी मंडळीची उपासमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक पाऊल पुढं टाकत दुपारी १२ ते १ शहीद भगतसिंग मैदान मुख्य दरवाज्यासमोर काळाचौकी इथं जेवण वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे."

शनिवारी दुपारी हा विचार आमच्या मनात आला आणि आम्ही तत्काळ कृती करत हा निर्णय जाहीर देखील केला आहे. आम्ही हा उपक्रम पुढील १० दिवस करणार आहोत. जर पुढील काळात आणखी काही दिवस निर्बंध वाढले तर त्याकाळात देखील आम्हाला मदत करता येऊ शकेल का याचा विचार आम्ही करत आहोत," असं उदय पवार यांनी सांगितलं.


पुढील बातमी
इतर बातम्या