अमर संदेशला जेतेपद तर विनायक पाटील ठरला उत्कृष्ट खेळाडू

अशोक क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अमर संदेशने जय भारत सेवा संघाला 32-28 ने पराभूत करीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. मात्र या स्पर्धेचा खरा हिरो ठरला तो अमर संदेशचा विनायक पाटील. त्याला 'कुलर फॅन' देऊन गौरविण्यात आले. मफतलाल कंपाऊंड मैदान,करीरोड नाका येथे हा सामना खेळवण्यात आला. आकाश चव्हाण,तेजस मोरे यांनी आपल्या चौफेर खेळाने जय भारतला पूर्वार्धात 13-10 अशी ३ गुणांची संघाला आघाडी मिळवून दिली. पण उत्तरार्धात त्यांना सातत्य राखता आलं नाही. उत्तरार्धात अमर संदेशने खेळात आक्रमकता आणली. त्यांच्या विनायक पाटील, विकास गुप्ता यांनी झंझावाती खेळ करत संघाला गुण मिळवून देण्याचा सपाटा लावला. त्यांच्या या खेळाने संघाला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. 

अमर संदेशला रोख 5 हजार आणि चषक तर उपविजेत्या जय भारतला चषक व रोख 3 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. जय भारतचा तेजस मोरे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा तर अमर संदेशचा आकाश चव्हाण स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरला. दोघांनाही प्रत्येकी कुलर फॅन देऊन सन्मानित करण्यात आले. या आधी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अमर संदेशने दिलखुशला 34-31असे तर, जय भारतने बालवीरला 24-20 असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. उपांत्य फेरीतील पराभूत संघांना चषक देऊन गौरविण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या