चक दे इंडिया : तब्बल ४१ वर्षानंतर हॉकीत भारताला ऑलिम्पिक पदक

भारताच्या पुरुष हॉकी संघाने कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा पराभव केला आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतानं ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. याआधी भारताने ऑलिम्पिकमध्ये १९८० साली अखेरचे पदक जिंकले होते. तेव्हा मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारतानं पुन्हा एकदा हॉकीतील सुवर्णयुगाची सुरुवात केली आहे.

५ ऑगस्ट रोजी झालेल्या कास्य पदकाच्या लढतीत जर्मनीने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून धडाकेबाज सुरूवात केली. पहिल्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा जर्मनीकडे १-० अशी आघाडी होती. या क्वॉर्टरच्या अखेरच्या काही मिनिटात जर्मनीला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारतानं त्यांना गोल करू दिली नाही. जर्मनीने दुसऱ्याच मिनिटाला गोल केल्याने भारताची बचाव फळी अलर्ट झाली.

दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने सुरुवातीच्या काही मिनिटात गोल करून १-१ अशी बरोबरी केली. पण जर्मनीने एकापाठोपाठ एक गोल करून ३-१ अशी मोठी आघाडी घेतली. भारत ही लढत गमवतोय की काय असे वाटत असताना पहिला हाफ संपण्याच्या आधी भारताने गोलचा धडाका लावला आणि ३-३ अशी बरोबरी केली.

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये सुरुवातीलाच रुपिंदर पाल सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिमरनजीतने भारतासाठी आणखी एक गोल करून ५-३ अशी आघाडी केली. तिसऱ्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा भारताने आघाडी कायम ठेवली होती.

भारतानं केलेले गोल

  • पहिला गोल- सिमरनजीत १७व्या मिनिटाला
  • दुसरा गोल- हार्दिक सिंग- २८व्या मिनिटाला
  • तिसरा गोल- हरमनप्रित सिंग- २९व्या मिनिटाला
  • चौथा गोल- रुपिंदर पाल सिंह- ३१व्या मिनिटाला
  • पाचवा गोल- सिमरनजीत ३४व्या मिनिटाला
पुढील बातमी
इतर बातम्या