देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोना संशयिताना सरकार क्वारंटाईन करत आहे. काही लोकांना सेल्फ-क्वारंटाईन केलं जात आहे. तर काहीजणांना डॉक्टरांच्या देखरेखेखाली हॉस्पिटलमध्ये ठेवलं जात आहे. मात्र अशा गंभीर स्थितीतही काहीजण हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. अशा लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार रिस्टबँड आणण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात सरकारनं माहिती दिली आहे.
हे रिस्टबँड काही प्रमाणात स्मार्टबँड सारखेच आहे. यात लोकेशन आणि शरीराचे तापमान ट्रॅक करण्यासारखे फीचर्स असतील. स्मार्ट रिस्टबँड तयार करण्याचा उद्देश क्वांरटाईन करण्यात आलेल्या लोकांना ट्रॅक करणे आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्या लोकांची मदत करणे हा आहे.
अमर उजालानं दिलेल्या वृत्तानुसार, सरकारनं हजारो रिस्टबँड तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. ब्रॉडकास्ट कंसल्टेंस इंडिया नावाची एक कंपनी पुढील आठवड्यात हॉस्पिटल आणि राज्य सरकारसाठी रिस्टबँडची डिझाईन सादर करेल. यासोबतच भारतीय स्टार्टअप्स सोबत काम करेल. रिस्टबँडमध्ये इमर्जेंसी बटन देखील असेल, ज्याद्वारे युजर्स मदत मागू शकतील.
रिस्टबँड वापरणाऱ्या लोकांच्या रोजच्या एकूणएक गोष्टींची माहिती याद्वारे सरकारला मिळणार आहे. त्यानुसारच हे रिस्टबँड डेव्हलप करण्यात आलं आहे.
कंपनीचे चेअरमन जॉर्ज कुरूव्हिला म्हणाले की, मे मध्ये रिस्टबँड बाजारात येतील. रिस्टबँडमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांच्या लोकेशनचा डेटाबेस असेल. याआधी हाँगकाँगनं देखील अशाच प्रकारच्या रिस्टबँडचा वापर केला आहे. हाँगकाँगनं लोकांच्या विदेश यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी रिस्टबँडचा वापर केला आहे.