बेस्टच्या ६० इलेक्ट्रिक बसेसचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईतील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसंच, वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळं पर्यावरणाची हानी होत आहे. ही हानी टाळण्यासाठी इलेक्ट्रीक गाड्यांना प्राधान्य दिलं जात आहे. अशातच बेस्टही आता आपल्या ताफ्यात इलेक्ट्रीत बस वाढवण्यावर भर देताना पाहायला मिळत आहे.

पर्यावरणीय बदलामुळे निसर्गचक्र बिघडले आहे. त्यामुळं मुंबईकरांना वायू आणि ध्वनी प्रदूषणमुक्त प्रवास घडविण्यासाठी बेस्ट उपक्रम यापुढे केवळ विद्युत बसगाड्यांचा वापर करणार असल्याचं प्रतिपादन पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं. ६० पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांचं उद्घाटन आणि लोकार्पण वरळी आगार इथं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवायची गरज असून बेस्टच्या ताफ्यातील बसेससाठी डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात येईल. तसेच महाराष्ट्रातही इतर ठिकाणी इलेक्ट्रिक बस चालविण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितलं. बेस्टच्या या पर्यावरणस्नेही उपक्रमाचे कौतुक करताना आदित्य ठाकरे यांनी महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या कामाची विशेष प्रशंसा केली. पर्यावरण संरक्षणासाठी बेस्ट महाव्यवस्थापक लोकेश चंद्र जलदगतीने काम करत असल्याचंही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास मुंबईच्या महापौर  किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, बेस्ट समिती सदस्य अनिल कोकीळ, अनिल पाटणकर, सुनील अहिर, बबन कनावजे, नगरसेवक संतोष खरात, नगरसेविका हेमांगी वरळीकर, बेस्टचे माजी अध्यक्ष सुनील शिंदे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाचे माजी प्रमुख एरिक सोल्हेम आणि बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र उपस्थित होते.

विरोधकांना केवळ टीका करण्याचे काम राहिलेले आहे. आम्ही आमचे काम करून दाखविणार आहोत. मुंबईकरांना चांगल्या सोयीसुविधा पुरविणार आहोत, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. लखीमपूर घटना अतिशय दुर्दैवी असून आठवडाभरानंतर पेंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक केली जाते. इतके दिवस यूपी पोलीस काय करीत होते, असा सवाल करीत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

बेस्टच्या या बसगाडय़ा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (टर्मिनल-2) ते गेट वे ऑफ इंडिया आणि बीकेसी अशा ‘पॉइंट टू पॉइंट’ चालविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात बेस्ट वीजेदेयके ऑनलाइन प्रदान करणाऱया ग्राहकांच्या लकी ड्रॉची सोडत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काढण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या