पायलट अभावी एअर इंडियाचं विमान तब्बल ७ तास रखडल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर घडला. यादरम्यान एअर इंडियाने विमान प्रवाशांना कोणत्याही सोयी-सुविधा न पुरवता त्यांच्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने वैतागलेल्या प्रवाशांनी आंदोलन केलं. तब्बल २५० प्रवाशांना एक रात्र विमानतळावर जागून काढावी लागली. सकाळी ८.३० सुमारास शेवटी या रखडलेल्या विमानानं उड्डाण केलं.
एअर इंडियाचं एआय ०३१ विमान मुंबईहून अहमदाबादसाठी रात्री १ वाजून ३५ मिनिटांनी उडणं अपेक्षित होतं. मात्र विमानतळावर आल्यावर प्रवाशांना सांगण्यात आलं की, पायलट उपलब्ध नसल्याने विमान सकाळी उड्डाण भरेल. विमान कंपनीने दिलेलं हे कारण प्रवाशांना अजिबात रुचलं नाही आणि त्यांनी थेट आंदोलन सुरू केलं.
सीआयएसएफनं प्रवाशांना समजावण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र प्रवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी विमान अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचादेखील प्रयत्न केला. यावेळी रात्रभर विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांना कोणतीही सुविधा एअर इंडियाने न पुरवल्याची तक्रार देखील प्रवाशांनी केली.