मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण, १२ डब्यांच्या सर्व लोकल रेल्वे आता १५ डब्यांच्या करण्यात येणार आहे. याबाबत, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
१२ डब्याच्या लोकलमध्ये ३००० प्रवासी प्रवास करण्याची क्षमता असते. मात्र, सकाळच्या वेळेस या लोकलमधून ५,५०० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. तर, १५ डब्यांच्या लोकलमध्ये ४२०० प्रवासी प्रवास करण्याची क्षमता असते, परंतु गर्दीच्या वेळी या लोकलमधून ७००० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात.
सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १०५ लोकल गाड्या आहेत. यामधील फक्त ५ लोकल १५ डब्यांच्या असून दिवसाला १७७२ फेऱ्या होतात. तसंच मध्ये आणि हार्बर रेल्वेमार्गावर १३३ लोकल गाड्यांपैकी फक्त १ लोकल १५ डब्याची आहे.