बेस्टनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, रेल्वेप्रमाणं आता बेस्ट प्रशासनही महिलांसाठी 'महिला विशेष बससेवा' सुरू करणार आहे. त्यामुळं अनेक वर्षांपासून प्रवाशांची असलेली विशेष बससेवेची प्रतिक्षा संपणार आहे. मुंबईत गर्दीच्या वेळी बसमध्ये चढताना महिलांचा मोठी गैरसोय होते. धक्काबुक्की, अनपेक्षित स्पर्श, आसनावरून होणारे वाद यांसारख्या अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. तसंच बस थांब्यावर होणाऱ्या गर्दीमुळं गरोदर महिला प्रवाशांची देखील गैरसोय होते. त्यामुळं गर्दीच्या वेळी फक्त महिला प्रवाशांना बसगाड्या उपलब्ध होण्यासाठी बेस्ट प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं महिला प्रवाशांना आता सुटसुटीत प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.
बेस्ट बसनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचीही संख्या लक्षणीय आहे. बसगाड्यांत महिला प्रवाशांसाठी राखीव आसनंही आहेत. मात्र, आसनासाठी या महिला प्रवाशांमध्ये सतत होणारे वाद पाहायला मिळतात. त्यामुळं अनेकदा या महिला स्त्रीयांसाठी राखीव असलेल्या सीटवर न बसता इतर सीटवर बसतात. त्यामुळं पुरूष प्रवासीही वैतागतात. यामुळं महिला प्रवाशांना प्रवास करताना बराच मनस्तापही सहन करावा लागतो. अपुऱ्या बसच्या फेऱ्या आणि वेगाने वाढणारी नागरी लोकसंख्या यामुळे नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या महिला प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. कित्येकदा रांगेत ताटकळत उभं रहावं लागतं.
मुंबईतील महिला प्रवाशांसाठी सुरू होणाऱ्या या बसबाबत मुंबई लाइव्हनं काही महिला प्रवाशांसोबत बातचीत केली. त्यावेळी त्यांनी खूप आनंद होत असल्याच सांगत बेस्ट प्रशासनाचे आभार मानले. तसंच, 'उशिरा का होईना जाग आली', असं त्यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय इतर प्रवाशांकडून होणाऱ्या त्रासातून सुटका होणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
हेही वाचा -
आता NEFT ने २४ तासांत केव्हाही पाठवा पैसे!
बेस्टवरील आर्थिक संकट लवकरच होणार दूर