गणेशोत्सवादरम्यान आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अवघे मुंबईकर रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडतात. अशावेळी रेल्वे मार्गावर अतिरिक्त गर्दी होते. या गर्दीचं नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर पाच दिवस विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला होता.
मात्र मध्य रेल्वेमार्गाबरोबरचं आता हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या अतिरीक्त गर्दीच्या नियोजनासाठी हार्बरमार्गावर तीन दिवस मध्यरात्री विशेष गाड्या सोडण्यात येतील. त्याचप्रमाणे दहा दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर देखील मध्यरात्री मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आठ विशेष गाड्या सोडल्या जातील.
गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी पाहता हार्बर रेल्वे मार्गावर बुधवारी १९ सप्टेंबर ते शनिवार २३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १.३० वाजता सिएसटीएम स्थानकातून लोकल सुटणार असून पहाटे २.५० ला ही लोकल पनवेलला पोहोचणार आहे. तसंच ही लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहे.
सार्वजनिक गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रविवारी मध्यरात्री मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ठाणे/पनवेल स्थानकादरम्यान विशेष आठ गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.