कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक

गणेशोत्सवाला आता अवघे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वत्र गणपत बाप्पाच्या आगमनाची तयारी केली जात आहे. अशातच गणेशोत्सव म्हटलं की अनेक जण आपल्या गावची वाट धरतात. त्यानुसार, यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानक व एसटी महामंडळाच्या एसटी बसमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या कोरोनाचं सावट असल्यानं यंदाही कोकणात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे.

गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांची ५ सप्टेंबर रविवारपासून कोरोना चाचणी केली जात आहे. २ लसमात्रा किंवा ७२ तास आधी कोरोना चाचणी अहवालाची अट शासनानं कायम ठेवली आहे. यापैकी काही नसल्यास एसटी, रेल्वे स्थानकाबाहेर किंवा गावागावांत कोरोना चाचणी करणं बंधनकारक असेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. रेल्वे, एसटी, जलमार्गे येणाऱ्यांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात आले आहे.

एसटी बस ज्या ठिकाणाहून सुटणार त्या ठिकाणी प्रवाशांची माहिती संकलित करून चालक-वाहक तालुक्याच्या एसटी आगारात जमा करतील. ही माहिती रोज तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. खासगी बसेसमधून आलेल्या प्रवाशांची माहिती संकलित करून ती दिली जाणार आहे. सोमवारी जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा, वाहतूक पोलीस, आमदार यांची बैठक बोलावली आहे. त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या