देशामध्ये कोरोना स्थिती पुन्हा गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळे नागरी उड्डाण संचालनालयाने (डीजीसीए) ने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. भारतातून परदेशात जाणाऱ्या आणि परदेशातून भारतात येणाऱ्या व्यावसायिक विमान उड्डाणांवरील ही बंदी वाढवली आहे.
डीजीसीएने शुक्रवारी याबाबत सूचना जारी केल्या आहेत. डीजीसीएने म्हटलं आहे की, २८ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदीची मुदत संपणार होती. मात्र, आता ही बंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. तसेच मालवाहतूक उड्डाणं आणि एअर बबल पॅक्ट (तात्पुरत्या सरकारी विमान कंपन्यांना परवानगी) अंतर्गत काही निवडक देशांसाठीची विशेष परवानगी मात्र कायम आहे.
निवडलेल्या मार्गांवर आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात विशिष्ट परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकते. त्याशिवाय कार्गो उड्डाणे आणि डीजीसीएने ज्या विमानांना मंजुरी दिली आहे त्यांना या नवीन सूचना लागू होणार नाहीत.
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांना भारत सरकारने २ जून २०२० पासून बंदी घातली होती. त्यानंतर वेळोवेळी ही बंदी वाढविण्यात येत आहे. देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. परंतु त्या पूर्वीच्या तुलनेतही कमी प्रमाणात आहे.
एअर बबल पॅक्ट म्हणजे काय
एअर बबल पॅक्ट म्हणजे अशी व्यवस्था ज्याद्वारे भारत आणि इतर देशांमध्ये करोनाच्या काळात काही नियम व अटी पाळून संबधित देशांच्या राष्ट्रीय विमान कंपन्यांना उड्डाणांची परवानगी देण्यात आलेली असते. भारतानं सध्या २७ देशांसोबत अशा प्रकारे एअर बबल पॅक्टवर सह्या केल्या आहेत. यामध्ये अफगाणिस्तान, बहरिन, बांगलादेश, भूतान, कॅनडा, इथिओपिया, फ्रान्स, जर्मनी, इराक, जपान, केनिया, कुवैत, मालदीव, नेपाळ, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, कतार, रवांडा, सिचेलस, टांझानिया, युक्रेन, युएई, युके, उझबेकिस्तान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.