पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता संप पुकारल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून परळ आणि मुंबई सेंट्रल एसटी स्थानकांतून एकही एसटी सुटलेली नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संप कुठल्याही अधिकृत संघटनेने पुकारलेला नाही. रात्री व्हॉट्सअॅपवर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे कर्मचारी गोंधळले आणि त्यातून मुंबईसह भंडारा, सांगली, औरंगाबाद आणि पुणे येथील डेपोमधील कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला. मुंबई सेंट्रल आणि ठाणे एसटी स्थानकात काही समाजकंटकांनी एसटी गाड्यांवर दगडफेक करून वातावरण चिघळवण्याचाही प्रयत्न केल्याचं म्हंटलं जात आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलेली पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने हंगामी कर्मचाऱ्यांनी २५ टक्के पगारवाढ देण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारल्याचं समजतं. पगारवाढ न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शिवशाही, शिवनेरी या बस वगळता अन्य सर्व बसेस बंद आहेत.