बुलेट ट्रेनची नाही तर सुरक्षित रेल्वेची खरी गरज - मेट्रोमॅन ई श्रीधरन

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • परिवहन

अहमदाबाद बुलेट ट्रेन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प! पण या प्रकल्पाला काही राजकीय पक्षासह स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. हा प्रकल्प म्हणजे मुंबईला महाराष्ट्रपासून तोडण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप होत आहे. असं असताना मेट्रोमॅन अशी ओळख असलेल्या ई श्रीधरन यांनीही पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर जोरदार टीका केली आहे. 

काय म्हणाले ई श्रीधरन

'बुलेट ट्रेन ही खूपच महागडी असून ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही. बुलेट ट्रेन ही गरीबांसाठी नसून श्रीमंतासाठी आहे. त्यामुळे आज देशाला खरी गरज असेल तर सुरक्षित रेल्वेची', असं परखड मत ई श्रीधरन यांनी व्यक्त केलं आहे. दिल्लीत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. बुलेट ट्रेनला जोरदार विरोध होत असताना ई श्रीधरन यांचं हे परखड मत महत्त्वाचं मानलं जातं आहे.

'भारतीय रेल्वे 20 वर्षे मागे'

'भारतीय रेल्वेचा विचार करता विकसित देशाच्या तुलनेत आजही भारतीय रेल्वे 20 वर्षे मागे आहे. रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी वा रेल्वेत अनेक आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण गरजेचं होतं. पण याच गोष्टी न झाल्यानं भारतीय रेल्वे आजही मागे' असल्याचं म्हणत ई श्रीधरन यांनी रेल्वेलाही टार्गेट केलं. 

'देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या रेल्वेला मजबूत आणि सुरक्षित करण्याची गरज असताना बुलेट ट्रेनसारख्या महागड्या आणि सर्वसामान्यांच्या काहीही कामाची नसलेल्या बुलेट ट्रेनवर लक्ष' दिलं जात असल्यानं ई श्रीधरन यांनी केंद्राच्या या धोरणाबाबत नाराजीही व्यक्त केली.


हेही वाचा -

मोदींच्या बुलेट ट्रेनविरोधात ठाकरे बंधू एकवटले!

पुढील बातमी
इतर बातम्या