केवळ ३३९ निलंबित एसटी कर्मचारी कामावर हजर; एसटी कर्मचारी संपावर ठाम

आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. मागील दीड महिन्यापासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे. परंतू, आता एसटी महामंडळानं या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली असून, त्यांच्या निलंबनाची कारवाई केली जात आहे. मात्र सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द होईल, असं अनिल परब यांनी म्हटलं होतं, पण अवघ्या ३ दिवसात केवळ ३३९ निलंबित कर्मचारी कर्तव्यावर परतले आहेत.

कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेले कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द होईल, असे आश्वासन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिले होते. परंतु त्यांच्या आश्वासनाला निलंबित कर्मचाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं उर्वरित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे.

एसटीचे राज्यातील २१ हजार ३७० कर्मचारी हजर झाले आहेत. प्रत्यक्ष संपात ६८ हजार १७८ कर्मचाऱ्यांचा सहभाग असून कर्मचारी परतण्याचे प्रमाण कमीच आहे.

एसटीचे एकूण २५० पैकी १२५ आगार अंशत: सुरु आहेत, तर १२५ आगार बंदच आहेत. ५० टक्के आगार सुरु झाल्याने सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत २ हजार ६३९ फेऱ्यांद्वारे एसटीची वाहतूक सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोमवारी १४९ निलंबित कर्मचारी कामावर परतले. तर तीन दिवसांत एकूण ३३९ निलंबित कर्मचारी कर्तव्यावर हजर झाल्याची माहिती मिळते. आतापर्यंत १० हजार २८० कर्मचारी निलंबित झाले आहेत. कर्तव्यावर परतलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येणार आहे. परंतु उर्वरित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे. 

निलंबन झाल्यावर १५ दिवसांत नोटीसला उत्तर देणं अपेक्षित असतं. अशा कर्मचाऱ्यांनीही अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. त्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी ३ वेळा संधी देण्यात आली. मात्र या कर्मचाऱ्यांनी उत्तर सादर केलेले नाही. त्यामुळं या कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस पाठवण्यात येणार आहे.

या नोटीसला कर्मचाऱ्यांनी ७ दिवसांत उत्तर देणं अपेक्षित आहे. तसे न केल्यास कर्मचारी बडतर्फ होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या