मुंबई-अलिबाग जलवाहतूक ३ दिवस बंद; प्रवाशांना मोठा मनस्ताप

एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि त्यातच आता जलवाहतूक बंद झाल्यानं अलिबागमधील प्रवाशांची दुहेरी कोंडी झाल्याचं चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. खाजगी वाहनं आणि शेअर टॅक्सीचा वापर करून मुंबई आणि पनवेल गाठण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळं प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. 

अलिबागमधील एसटीच्या कामगार संघटनांनी आपली आडमूठी भुमिका अद्याप सोडलेली नाही. पगारवाढ मिळूनही अलिबाग आगारातील कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे नौदल सप्ताहामुळं मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवादरम्यान सुरु असणारी जलप्रवासी वाहतूक २ ते ४ डिसेंबर अशी तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे.

मुंबईत जाणाऱ्या आणि अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची दुहेरी कोंडी झाली आहे. मुंबई ते अलिबाग दरम्यान मांडवामार्गे जल प्रवासी वाहतूक केली जाते, यातून दररोज सुमारे साडेतीन हजार प्रवासी प्रवास करतात. शनिवार रविवार या २ दिवसात या जलमार्गावरील प्रवाशांची संख्या ८ ते १० हजारांपर्यंत पोहोचते, जलद आणि आरामदायी प्रवासासाठी या मार्गाला प्रवाशांची पसंती मिळत असते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात या जलवाहतुकीचा मोठा आधार अलिबागकरांना होता. मात्र नौदल सप्ताहामुळे जलवाहतूक प्रवासी सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांची मोठीच अडचण झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या