India-England क्रिकेट मॅचसाठी मेट्रो रात्री उशीरापर्यंत धावणार

Mumbai Metro Rail Corporation तर्फे चालवली जाणारी मुंबई मेट्रो लाईन-३ (अॅक्वा लाईन)ने गुरुवारी मेट्रोच्या वेळेत बदल केला आहे. त्यानुसार मेट्रो उशीरापर्यंत धावणार आहे.

 दक्षिण मुंबईत होणाऱ्या ICC Men's T20 World Cup 2026 उपांत्य फेरीतील भारत विरुद्ध इंग्लंड या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी प्रेक्षकांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा सामना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम येथे होणार आहे.

सायंकाळी 7 वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात हालचाल होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रो लाईन-3 वर दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत, म्हणजेच रात्री 11:59 वाजेपर्यंत अप आणि डाउन दोन्ही मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पूर्णपणे भूमिगत असलेली अॅक्वा लाईन 33.5 किमी लांबीची असून, ती कफ परेड ते आरे कॉलनीदरम्यान 27 स्थानकांवरून धावते. चर्चगेट, विधान भवन, हुतात्मा चौक आणि सीएसएमटी ही स्थानके वानखेडे स्टेडियमजवळ असल्याने प्रेक्षकांना जलद आणि सोयीस्कर ‘लास्ट-माईल’ कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

सामन्यानंतर प्रेक्षकांसाठी मोठा दिलासा म्हणजे चर्चगेटहून शेवटची मेट्रो रात्री 11:59 वाजता सुटणार आहे. त्यामुळे 5 मार्चला रात्रीचा सामना संपल्यानंतरही प्रेक्षकांना घाई न करता सुरक्षितपणे घरी परतता येणार आहे.

हा विशेष मेट्रो उपक्रम विश्वचषक उपांत्य फेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या व्यापक वाहतूक नियोजनाचा भाग आहे. क्रिकेटच्या सर्वात रोमांचक मैदानांपैकी एक असलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यासाठी शहर सज्ज झाले आहे.


हेही वाचा

सफाई कामगारांना मिळणार हक्काचे निवासस्थान

पुढील बातमी
इतर बातम्या