परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा (Rickshaw) परवान्यांची आणि बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी (Re verification) करून 1 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
आमदार नरेंद्र मेहता यांच्या तक्रारीनंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व राज्य परिवहन अधिकाऱ्यांची बैठक झाली.
परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर, उपसचिव चेतन निकम आणि राज्यभरातील परिवहन अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "परवाना देण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे, परंतु बनावट कागदपत्रांच्या आधारे परवाने दिले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात काही परदेशी नागरिकांनी रहिवासी प्रमाणपत्रांचा वापर करून रिक्षा आणि टॅक्सी परवाने मिळवल्याच्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल."
मीरा-भाईंदर परिसरात एक विशेष शिबिर आयोजित केले जाईल, जिथे सर्व रिक्षा परवान्यांची कसून तपासणी केली जाईल.
ही एक महिनाभर चालणारी मोहीम असेल, ज्यामध्ये प्रत्येक कागदपत्र तपासले जाईल. आवश्यकतेनुसार अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
हेही वाचा