मुंबईकरांचा रेल्वेप्रवास सुसह्य आणि जलद होण्यासाठी येत्या ५ वर्षांत रेल्वे सुविधांमध्ये मोठं परिवर्तन पाहायला मिळेल, असं आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. मुंबईच्या रेल्वे संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीदरम्यान ते बोलत होते.
० एमयुटीपी 3 अंतर्गत येणारा पनवेल-सीएसएमटी जलद रेल्वे मार्ग
० विरार-गोरेगाव उन्नत रेल्वे मार्ग
० पनवेल-कर्जत अतिरिक्त रेल्वे मार्ग
याशिवाय, भाईंदर खाडीवरील पुलाचा वसई विरारपर्यंत विस्तार, तसंच अधिक गर्दी असणाऱ्या रेल्वे स्थानकाची स्थिती सुधारण्याबाबतचा निर्णयही या बैठकीत घेतल्याचं गोयल यांनी सांगितलं.
सीएसएमटी-पनवेलदरम्यान फास्ट इलेव्हेटेड कॉरिडॉर विकसित करणे, पनवेल ते विरार दरम्यान नवीन उपनगरीय कॉरिडॉर विकसित करणे, हार्बर लाइन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढवणे, इतर काही रेल्वे मार्ग वाढवणे अशा विविध प्रकल्पांची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसंच, लोअर परेल, खार रोड, गोरेगाव, मीरा रोड, विरार, घाटकोपर, डोंबिवली, नालासोपारा, भाईंदर, मुलुंड, डोंबिवली, भांडुप, वडाळा रोड, सायन, जीटीबी नगर, चेंबूर, शहाड आदी विविध रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात यावं, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. या सर्व प्रकल्पांना रेल्वे बोर्डाच्या बैठकीत मान्यता देऊन ते सुरू केले जातील, असं आश्वासन यावेली रेल्वे मंत्री गोयल यांनी दिलं.