लोकलमधून विनातिकीट प्रवास करणे कायद्यानं गुन्हा आहे. याबाबत रेल्वेला सहकार्य कराव, असं प्रवासादरम्यान नेहमी ऐकायला येतं. मात्र, तरीही अनेक प्रवासी रेल्वेचे नियम मोडून लोकलेन विनातिकीट प्रवास करताना दिसतात. या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासनीसांचे पथक उभारून एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत ११६.८६ कोटींचा दंड वसूल केल्याची माहिती समोर आली आहे. तसंच, पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या वर्षी विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेल्या दंडाच्या तुलनेत यंदा १७.६७ टक्के दंडाची रक्कम अधिक आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर आणि रेल्वे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने २ हजार ३६३ तिकीट तपासनीसांची पथके तयार केली असून, विनातिकीट प्रवाशांकडून ११६.८६ दंड वसूल केला आहे. त्याशिवाय, अनारक्षित साहित्य मेल, एक्स्प्रेस आणि लोकलमधून घेऊन जाणाऱ्या प्रवाशांच्या २५ लाख १७ हजार तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. तसंच, या प्रवाशांकडून ११६.८६ कोटी रुपये दंड वसूल करण्याच आल्याची माहिती समोर आली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल आणि मेल,एक्स्प्रेसमधीस प्रवाशांच्या तिकीट तपासण्यासाठी मोबाइल दल तयार करण्यात आले आहे. या पथकात एकूण २४ कर्मचारी काम करत असून, विनातिकीट आणि अनारक्षित सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर या पथकाद्वारे कारवाई केली जाते.
स्थिर दलाकडून स्थानकावरून विनातिकीट प्रवास करणाऱ्या आणि अनारक्षित सामान घेऊन प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी ८ पथके कार्यरत आहेत. त्याशिवाय १३ पथके स्थानकावर उभे राहून रेल्वे नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करतात. या पथकामध्ये ‘सुरक्षिणी’ नावाचे देखील पथक कार्यरत आहे. या पथकात ३ महिला असून लोकल आणि स्थानकांवरील महिला प्रवाशांच्या समस्या सोडविण्याचे काम आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर कारवाई करण्याचे काम हे पथक करते.