मुंबई महापालिका तसंच खासगी हद्दीतील विहिरी लवकरच पुनरुज्जीवित होणार आहेत. या विहिरींच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पात १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. या निधीचा योग्य वापर झाल्यास मुंबईकरांना पाणीपुरवठ्याचा जुना स्त्रोत पुन्हा एकदा उपलब्ध होऊ शकेल.
एका बाजूला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाण्याची पातळी खालावल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. मुंबईकरांना १० टक्के पाणीकपातीला सामोरं जावं लागत असल्याने महापालिकेकडून पाणी बचतीचं आवाहन केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील पाण्याचा पुरातन स्त्रोत असलेल्या विहिरींची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शहरातील असंख्य विहिरी एक तर बुजलेल्या आहेत किंवा अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. काही ठिकाणी या विहिरी रहिवाशांसाठी धोकादायकही ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर नगरसेविका ज्योती खान यांनी मुंबईतील धोकादायक आणि अस्वच्छ विहिरींची स्वच्छता, दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावर अभिप्राय देताना मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतील विहिरी पुनरुज्जीवित करण्यासाठी १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केल्याची माहिती दिली.
या विहिरींची दुरूस्ती झाल्यास तसंच पाणी वापरण्यायोग्य झाल्यास हे पाणी कपडे, भांडी, गाडी धुणे, गार्डनिंग इत्यादीसाठी वापरता येऊ शकतं. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
हेही वाचा-
कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठवली
'गोदरेज प्रॉपर्टीज'ने विकत घेतला आर.के, स्टुडिओ