भाजप सरकार चीनच्या मॉडेलवर चालत असून चीनला डोळे दाखवायला घाबरत असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं असल्याच्या अमित शहांच्या आरोपालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी नुकतीच एबीपी न्यूजला मुलाखत दिली आणि आपले मत मांडले.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. "आजचा भाजप हा जुना भाजप नाही. आजचा भाजप चायनीज मॉडेलवर चालत आहे. केंद्रातील मोदी सरकार चीनला डोळे दाखवायला घाबरत आहे, पण हे सरकार त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे", असं ते म्हणाले.
भाजपला संविधान मान्य नाही
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान भाजपला मान्य नाही. त्यांना लोकशाही मान्य नाही. आज देशातील महिला घाबरल्या आहेत. कर्नाटकचे उदाहरण ताजे आहे. कर्नाटकातील रेवण्णा प्रकरण भयंकर आहे. मुंबईतही भाजपने अशाच एका उमेदवाराला तिकीट दिल्याची टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.
अमित शहांच्या आरोपाला उत्तर
दरम्यान, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणार असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्याने शिवसेनेत फूट पडली. या आरोपाला आदित्य ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. "अमित शहांच्या आरोपात तथ्य नाही. त्यांना आरोप करायचे असतील तर ते करू शकतात. पण शिवसेना का आणि कोणी फोडली, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. आज बाहेरचे लोक आले आहेत आणि कोणती शिवसेना खरी आणि कोणती खोटी, असे सांगत आहेत. शिवसेना हे कदापि सहन करणार नाही.
ठाकरे यांची निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका
पुढे बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. "निवडणूक आयोग आज पूर्णपणे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे. जेव्हा आमचा पक्ष दोन गटात विभागला गेला होता, तेव्हा त्यांनी भाजपच्या विनंतीवरून आपला अहवाल लिहिला. आज निवडणूक आयोगाने आम्हाला जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा न देण्याचे आदेश दिले आहेत. जय भवानी जय शिवाजीचा नारा महाराष्ट्रात द्यायचा नसेल तर एकंदरीत या लोकांचा महाराष्ट्रद्वेष कुठून पुढे आला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा