काही दिग्दर्शक आणि कलाकारांचं नातं अतूट असतं. त्यामुळंच पुन: पुन्हा ते एकत्र येतात. ऐश्वर्या राय-बच्चन आणि दिग्दर्शक मणीरत्नम यांचंही असंच काहीसं अनोखं नातं आहे. त्यामुळंच कदाचित मणीसाठी ऐश चक्क खलनायिका बनणार आहे.
ऐश्वर्या-मणीरत्नम या जोडीनं यापूर्वी प्रेक्षकांना काही मनोरंजक चित्रपट दिले आहेत. यात तमिळ आणि हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. १९९७ मध्ये 'इरुवर', २००७ मध्ये 'गुरू' आणि २०१० मध्ये 'रावण' आणि 'रावणन' या मणिरत्नम यांच्या चित्रपटात ऐशनं मुख्य नायिका साकारली आहे. आता ती मणीरत्नम यांच्या चित्रपटात नायिका नव्हे, तर खलनायिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट आणि यातील भूमिका ऐशच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचं बोललं जात आहे.
बाळंतपणानंतर जवळजवळ पाच वर्षे ब्रेक घेतल्यावर पुनरागमन करणाऱ्या ऐशनं 'जज्बा', 'सरबजीत', 'ऐ दिल है मुश्कील' आणि 'फन्ने खान' या चित्रपटांमध्ये अभिनय केला, पण यापैकी 'ऐ दिल है मुश्कील' हा चित्रपटच बॅाक्स आॅफिसवर कमाल दाखवू शकला. त्यामुळंच ऐशला आता एका हिट चित्रपटाची नितांत गरज आहे. आपल्या करियरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मणीरत्नमच आपल्याला एक हिट मिळवून देऊ शकतात अशी खात्री असल्यानंच कदाचित ऐशनं त्यांच्या चित्रपटात खलनायिका बनण्याचं आव्हान स्वीकारलं असावं.
मणीरत्नम सध्या एका पिरीयड ड्रामा असलेल्या चित्रपटावर काम करत आहेत. याच चित्रपटात ऐशचं आजवर कधीही न पाहिलेलं रूप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा पोन्नीईन सेल्व्हन या कादंबरीवर आधारित असून, १०व्या शतकातील आहे. हा चित्रपट चोला किंग अरुल्मोझीच्या कालखंडातील आहे. ऐश या राजाच्या विरोधातील स्त्रीची भूमिका साकारत आहे. एका चांगल्या राजाला नेस्तनाबूत करण्यासाठी ती षडयंत्र रचतानाही दिसणार आहे. हे कॅरेक्टर आजवर ऐशनं साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या अगदी विरुद्ध असल्यानं आपल्या आवडत्या अभिनेत्रीला खलनायिकेच्या रूपात पाहताना तिचे चाहते कशा प्रकारची प्रतिक्रिया देतात ते पाहायचं आहे.
हेही वाचा-
'किक' मारण्यापूर्वी सलमान म्हणणार 'इंशाअल्लाह'
अक्षय आणि विद्याच्या 'भुलभुलैय्या' चित्रपटाचा सीक्वेल येणार