नवी मुंबईतील तळोजा सेक्टर-10 परिसरात मंगळवारी भरधाव कारने अनेक पादचाऱ्यांना चिरडल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याबाहेर जाऊन रस्त्यालगत चालत आणि उभ्या असलेल्या नागरिकांवर आदळली. धडकेचा जोर इतका होता की काही जण दूर फेकले गेले. या अपघातात परिसरातील दुचाकी आणि रिक्षांचेही मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, चालक अपघातग्रस्त कार घटनास्थळीच सोडून फरार झाला. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.
घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून, भरधाव वेग, चालकाचा निष्काळजीपणा किंवा वाहनातील बिघाड यापैकी नेमके कोणते कारण अपघातास कारणीभूत ठरले, याचा तपास पोलीस करत आहेत.
या भीषण अपघातामुळे तळोजा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, रस्ते सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा