बोटीतून पडलेल्या साईशचा मृतदेह राजभवनजवळ सापडला

गणेश विसर्जनाच्या दिवशी लालबागचा राजाच्या विसर्जनाच्या वेळी बोट उलटून ५ जण बुडाले होते. या ५ जणांपैकी ४ जणांना वाचवण्यात आलं होतं ,तर याच बोटीतील ५ वर्षांचा साईश मर्दे हा लहान मुलगा बेपत्ता होता. अखेर ६ दिवसानंतर शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास चिमकुल्या साईशचा मृतदेह सापडला. राजभवन परिसराच्या आसपास त्याचा मृतदेह सापडला असून साईशच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कशी घडली दुर्घटना?

पालघर इथं राहणारं मर्दे कुटुंब विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आलं होतं. सोमवारी सकाळी लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी साईश आपले वडील, आई आणि १० वर्षांच्या बहिणीसोबत बोटीत बसला होता. अचानक ही बोट कलंडली आणि बोटीतले ५ जण बुडाले. बोट कलंडल्याबरोबर अग्शिशमन आणि पोलिसांनी बुडालेल्यांना वाचवलं. सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेल्यांना नायर रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

अखेर शोध थांबला

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये साईशचे वडील, आई आणि बहिणाचा समावेश होता. पण साईश नायर वा इतर कुठल्याही रूग्णालयात नव्हता. त्यामुळं त्यांच्या आई-वडिलांना धक्का बसला. त्यानंतर साईश बेपत्ता झाल्याचं समोर आलं. साईशचा शोध प्रशासन आणि यंत्रणांकडून सुरू होता. बोट कलंडली तेव्हा साईश आपल्या आईच्या मांडीवर होता. त्याला पाण्यातून उचलून दुसऱ्या बोटीतून नेण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. पण प्रत्यक्षात मात्र साईश काही कुठंही सापडत नव्हता.

शनिवारी अखेर साडे अकराच्या सुमारास यंत्रणांना साईशचा मृतदेह राजभवन परिसरात सापडला. साईशचा मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आल्याचं समजतं आहे.


हेही वाचा-

राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली, पाच जखमी

लालबागच्या राजाचं 21 तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन


पुढील बातमी
इतर बातम्या