महाराष्ट्रात ५१ हजार उद्योग सुरू- सुभाष देसाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्रात सध्या ५१ हजार उद्योग सुरू (51 thousand business starts in maharashtra says industries minister subhash desai) झाले आहेत. १३ लाख कामगार या विविध उद्योगांमध्ये रुजू झाले आहेत. छोट्या व मध्यम उद्योगांसाठी राज्य शासन लवकरच विवध योजना जाहीर करणार आहे. तसंच मजुरांसाठी कामगार ब्युरोची स्थापना करण्यात आली असून त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. देसाई केंद्र शासनाच्यावतीने विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी तयार केलेल्या इन्व्हेस्ट इंडिया फोरममध्ये बोलत होते.

या फोरममध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुंतणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाची भूमिका विशद केली. इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीवर देखील या वेबिनारमध्ये चर्चा करण्यात आली. या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र योग्य ठिकाण असल्याचं देसाई यांनी उपस्थितांना सांगितलं.

हेही वाचा - उद्योग क्षेत्रातील संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा – उद्योगमंत्री सुभाष देसाई

गुंतवणुकीसाठी याेग्य ठिकाण

देसाई म्हणाले की, महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्राच्या वाढीला मोठी संधी आहे. सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. परंतु गॅझेट वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. घरी राहून काम करणाऱ्यांना देखील इलेक्ट्रॉनिक गॅझेटमुळे मोठी मदत झालेली आहे. पुढील काळात इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्राची मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. त्यांना सर्व सुविधा व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील, असं सुभाष देसाई म्हणाले.

महाराष्ट्राला पसंती

सध्या महाराष्ट्र शासनाचे इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रासाठी विशेष धोरण आहे. त्याद्वारे काही सवलती दिल्या जात आहेत. गुंतवणुकदारांना योग्य प्रोत्साहने दिली जात आहेत. याशिवाय डेटा सेंटर्स, विकास आणि संशोधन केंद्र, सुसज्ज इंटरनेट जाळं आदीमुळे गुंतवणूकदार महाराष्ट्राला अधिक पसंती देतात. येथे मुबलक प्रमाणात व दर्जेदार मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे देश-विदेशातील गुंतवणुकदारांनी या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्राची निवड करावी, असं आवाहन देसाई यांनी केलं.

या चर्चासत्रात उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगना राज्यांनी देखील सहभाग घेतला होता.

हेही वाचा - भूमिपुत्रांनो, नोकरीसाठी तयार व्हा! महाराष्ट्रात कामगार ब्युरोची लवकरच स्थापना

पुढील बातमी
इतर बातम्या