राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प आहे. या पुनर्विकास प्रकल्पाचा भाग असलेल्या ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील (BDD chawl) रहिवाशांनी एकास एक पार्किंग अशी भूमिका घेतली आहे.
या प्रकल्पातील वरळी बीडीडीपाठोपाठ नायगाव (naigaon) येथेही एकास एक पार्किंग दिले जात असताना ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनाही त्याच पद्धतीने सुविधा देण्याची मागणी केली आहे.
या मागणीसाठी रहिवाशांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना पत्र पाठवलं आहे. राज्य सरकारने वरळीतील (worli) बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात एकास एक पार्किंगची सुविधा पुरवली आहे.
आधी या प्रकल्पातील रहिवाशांना 'दोनास एक प्रमाणे पार्किंग सुविधा देण्याचा प्रस्ताव होता. त्यानंतर वरळी बीडीडी चाळ प्रकल्पातील रहिवाशांना एकास एक पार्किंगची सुविधा पुरवण्यात आली आहे.
याशिवाय, नायगाव बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात स्वतंत्र पार्किंग इमारत उभारून रहिवाशांना एकास एक पार्किंग सुविधा देण्यात येईल, असं आश्वासन म्हाडा प्रशासनाकडून देण्यात आल्याची चर्चा आहे.
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांना जागेअभावी एकास एक पार्किंग (parking) देता येणार नाही, असं म्हाडा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
यामुळे एकाच प्रकल्पाच्या दोन विभागांत एकास एक पार्किंग असताना केवळ ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी दोनास एक पार्किंग हे सूत्र अन्यायकारक असल्याची स्पष्ट म्हाडा भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.
त्यासंदर्भात, ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीतर्फे प्राधिकरणाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला, असं समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी सांगितलं.
त्या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे यासाठी एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र पाठवलं आहे, असेही ते म्हणाले.
ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील सर्व पात्र रहिवाशांना वरळी व नायगावप्रमाणे एकास एक पार्किंग सुविधा देण्यासाठी योग्य कार्यवाही करावी, असं पत्रात नमूद केलं आहे.
हेही वाचा