गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनासोबतच बर्ड फ्ल्यू या आजाराचं देखील सावट आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी पक्षी मृतावस्थेत आढळून येत आहेत. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनं झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईतील नागरीकांमध्ये देखील बर्ड फ्ल्युची भीती पसरली आहे. याचाच परिणाम अंड्यांच्या किंमतींवर झाला आहे.
या भीतीचा थेट चिकन आणि अंड्यांवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. मुंबईत अंड्यांचे दर ६ रुपयांवरुन सोमवारी ५ रुपयांवर घसरले आहेत. तर, येत्या दोन दिवसांत सरकारनं ठोस निर्णय घेतला नाही तर अंडा बाजारात दर ३ ते ४ रुपयांवर येण्याची भीती अंडा व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
अंड्यासोबतच चिकनच्या किमतीत देखील घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. चिकनच्या किमती १० ते २० रुपयांनी घसरल्या आहेत. त्यामुळे विक्रित ५० टक्क्यांची घट झाली आहे.
चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू हा माणसांना अजिबातच होत नाही. भारतात बर्ड फ्लू माणसांना झाल्याची आजपर्यंत एकही घटना घडलेली नाही. फक्त चिकन आणि अंडी पूर्ण उकळून खाल्ली पाहिजेत, असं स्पष्टीकरण परभणीच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता नितीन मार्कंडेय यांनी दिली.
हेही वाचा