समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनवण्याच्या प्रकल्पाला मान्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं समुद्राच्या खाऱया पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचे ठरवलं आहे. त्यासाठी स्थायी समितीनं तत्वतः मान्यता दिली आहे.

मुंबई महानगराला वेगवेगळ्या अशा सात जलाशयांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. ब्रिटिश काळापासून ते अलीकडे बांधलेली जलाशये देखील त्यात समाविष्ट आहेत. या धरणांमधील पाणीसाठा हा त्यांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पर्जन्यमानावर अवलंबून असतो.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा खालावल्यास मुंबईला १० ते २० टक्के पाणीकपातीस सामोरे जावं लागतं. जागतिक हवामान बदलामुळे मागील काही वर्षांमध्ये पावसाळ्यास विलंब होत आहे. याचाच परिणाम पाहायला मिळत आहे.

जागतिक तज्ज्ञ व अनुभवी अशा मेसर्स आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजीज लि. या कंपनीनं महानगरपालिकेकडे प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शासनाचा अधिनियम Maharashtra Infrastructure Development Enabling Authority Act 2018 च्या अनुषंगानं सादर करण्यात आला आहे.

मेसर्स आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजीज लि. कंपनीनं बृहन्मुंबई महानगरपालिकेला सादर केलेल्या अनाहूत प्रस्तावानुसार, मुंबईसाठी प्रारंभी प्रतिदिन २०० दशलक्ष लीटर क्षमतेचा निःक्षारीकरण प्रकल्प बांधता येऊ शकेल. भविष्यात त्याचा ४०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेपर्यंत विस्तार होवू शकेल. त्यासाठी प्रारंभी ६ हेक्टर आणि नंतर विस्तारासाठी ८ हेक्टरपर्यंत जागेची आवश्यकता असेल.

प्रतिदिनी 200 दशलक्ष लीटर क्षमतेचा प्रकल्प उभारणीसाठी अंदाजे १६०० कोटी रुपये भांडवली खर्च आणि २० वर्षांचा प्रचालन आणि परिरक्षण खर्च हा सुमारे १९२० कोटी रुपये इतका होऊ शकतो.

मुंबईच्या किनाऱ्यालगत खाडीपासून लांब अशी जागा या प्रकल्पासाठी आवश्यक आहे. ही बाब पाहता मनोरी इथं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित सुमारे १२ हेक्टर शासकीय जागा निदर्शनास आली आहे. ही जागा हस्तांतरित करण्याबाबत देखील महानगरपालिकेकडून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबरोबर पत्रव्यवहार करण्यात येत आहे.


हेही वाचा

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १ मार्चपासून सुरू

मुंबईत ६५ ठिकाणी स्ट्रीट फूड हब उभारणार

पुढील बातमी
इतर बातम्या