हायकोर्टात यापुढेही केवळ महत्त्वांच्या प्रकरणांवरच होणार सुनावणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून केंद्र सरकारने १७ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढवलं आहे. यामुळे लाॅकडाऊनच्या काळात केवळ महत्त्वाच्याच प्रकरणांवर मर्यादित वेळेत सुनावणी घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला असून त्यासंदर्भातील परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे.

याआधीही उच्च न्यायालयाने लॉकडाऊनच्या काळात महत्त्वांच्या प्रकरणावर सुनावणी घेण्याबाबतचं परिपत्रक दोनदा काढले होतं. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व प्रशासकीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील कनिष्ठ न्यायालये मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ महत्त्वाच्या याचिकांवरच  सुनावणी घेतील. ही पद्धत १६ मेपर्यंत किंवा पुढील आदेश मिळेपर्यंत सुरू ठेवावी, असंही परिपत्रकात म्हटलं आहे.

हेही वाचा - चाकरमान्यांसाठी एकदाच काय ते धोरण ठरवा- नितेश राणे

सुनावणीदरम्यान वकील, पक्षकार, न्यायालयाचे कर्मचारी यांनी कोणती खबरदारी घ्यावी, याची यादीही न्यायालयाने सादर केली आहे. त्यानुसार...

  • वकील, पक्षकार, न्यायालयाचे कर्मचारी या सर्वांनी आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू अ‍ॅप इन्स्टॉल करावा
  • उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारांवर वकील व पक्षकारांकडे ओळखपत्राची विचारणा होईल. 
  • वकील, पक्षकार, न्यायालयाचे कर्मचारी या सर्वांनी मास्क लावणं बंधनकारक असेल.
  • प्रत्येक कोर्ट हॉलबाहेर सॅनिटायझर देण्यात येईल. 
  • कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तीला कोर्ट रूममध्ये प्रवेश मिळणार नाही. अशा व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष असेल. 
  • न्यायालयात प्रत्येकाला सामाजिक अंतर ठेवावंच लागेल. 
  • वकिलांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी ठरावीक वेळ देण्यात येईल, असं महानिबंधकांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

याशिवाय एप्रिल २०२१ पर्यंत जिल्हा न्यायपालिकेतील सर्वसाधारण बदल्या तहकूब करण्याचा निर्णयही उच्च न्यायालयाने घेतला आहे. 

हेही वाचा - महाराष्ट्रातून पाठवलेल्या परप्रांतीयांची कोंडी, उत्तर प्रदेश सरकार म्हणतं…
पुढील बातमी
इतर बातम्या