मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाबाबत मोठी घोषणा केली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाला रोखण्यासाठी जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
त्यासोबत, लम्पी स्कीन आजारांमुळे मृत पावलेल्या जनावरांचा मोबदला त्या शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
औरंगाबादमधील विनोद पाटील यांनी लम्पी स्कीन आजाराचा धोका ओळखून क्वारंटाईन सेंटर उभारण्याची मागणी केली होती. याचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी आज क्वारंटाईन सेंटर उभारण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, लम्पी रोग राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ज्या ठिकाणी लम्पी रोगाची लागण झालेली आहे त्या ठिकाणाहून पाच किमीच्या परिघात सर्व जनावरांचं लसीकरण केलं जाणार आहे.
राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापन करण्यात आील आहे. लम्पी रोग अटोक्यात आणण्यासाठी नियमित आढावा घेऊन त्यावर उपाययोजना आणि शिफारस हे टास्क फोर्स करणार आहे.
लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची 'ड्रग्ज बँक' देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राज्यासाठी एका आठवड्यात 50 लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत. लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी. खाजगी पशुवैद्यकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात, असेही विखे पाटील यांनी सांगितलेय.
हेही वाचा