राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मे महिन्यातील नियमित धान्य वाटपाला सुरूवात करण्यात आली आहे. शिधापत्रिकाधारकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून अन्नधान्य घेण्याचं आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांनी केलं आहे.
अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठी
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मे महिन्यातील नियमित ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रतिमाणसी रुपये २ प्रति किलो दराने गहू व रुपये ३ प्रति किलो दराने तांदूळ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तसंच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य प्रति शिधापत्रिका रु . २ प्रति किलो दराने गहू व रु . ३ प्रति दराने तांदूळ वितरीत करण्यात येत असून आतापर्यंत ३ टक्के शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचं वितरण करण्यात आलं आहे.
हेही वाचा - रेशनचं धान्य घेताना आता ‘अंगठा’ लावण्याची गरज नाही!
२ किलो डाळ
मे महिन्याच्या नियमित अन्नधान्याच्या वितरणाबरोबरच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका महिना १ किलो डाळ या परिमाणात (तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ १ किलो या कमाल मर्यादेत) एप्रिल व मे महिन्याची एकूण २ किलो मोफत डाळ वितरित करण्यात येईल.
केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये ५९००० / – पेक्षा जास्त व रूपये १ लाखापर्यंत असणाऱ्या एपीएल ( केशरी ) शिधापत्रिकाधारकांना गह रू . ८ प्रति किलो व तांदूळ रू . १२ प्रति किलो या दराने प्रति महिना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्याचं मे महिन्याचं वितरण २४ एप्रिल २०२० पासून सुरू करण्यात आलं असून या अन्नधान्याचं वितरण मे महिन्यातही सुरु राहील. आतापर्यंत तांदूळ १४९५ मेट्रिक टन आणि गहू १९२५ मेट्रिक टन इतक्या अन्नधान्याचं १२ टक्के शिधापत्रिकाधारकांना वितरण पूर्ण करण्यात आलं आहे.
मोफत तांदळाचं वाटप
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी ५ किलो मोफत तांदळाचं मे महिन्याचं वाटप १२ मे २०२० पासून सुरु करण्यात येईल.
हेही वाचा - उरलेलं धान्य गरीबांना देऊ द्या, छगन भुजबळांनी मागितली केंद्राकडे परवानगी
इथं करा तक्रार
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशीलाबाबत शासनाच्या http : / / mahaepos.gov.in या वेबसाइट वरील RC Details मध्ये जाऊन शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेला १२ अंकी SRC Number टाकून खातरजमा करता येईल. याबाबत तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक ०२२ – २२८५२८१४ तसंच ई – मेल क्रमांक dycor.ho.mum@gov.in यावर तक्रार नोंदवता येईल. जर अधिकृत शिधावाटप दुकानदाराने त्यानुसार अन्नधान्य न दिल्यास त्याच्याविरूद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल.