पालघर जिल्ह्याच्या जव्हारच्या कालमांडवी धबधब्यात आंघोळ करण्यासाठी गेलेली ५ जणं वाहून गेली होती. गुरुवारची ही घटना आहे. या ५ जणांचे मृतदेह शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले आहेत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रथमेश चव्हाण (वय २०), देवेंद्र वाघ (वय २८), निमेश पटेल (वय २८), देवेंद्र फलटणकर (१९) आणि रिंकू भोईर (२०) अशी या ५ जणांची नावं आहेत. अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गुरुवारी अंबिका चौक भागात राहणारी १३ जण कालमांडवी धबधब्यात अंघोळ करण्यासाठी गेले होते. परंतु पावसाच्या पाण्यामुळे धबधब्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ५ जण बुडाले होते. आज या पाचही जणांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला होता. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले. १३ जण या धबधब्याजवळ फिरायला गेले होते. तिथं ५ जणांचा बुडून मृत्यू झाला आणि सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रवक्ते सचिन नवाडकर यांनी दिली आहे.
कोरोनामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अशात लोकांना बाहेर पडण्यावर बंदी आहे. सर्व पर्यटन स्थळंदेखील बंद आहेत. पण तरीहीदेखील काही लोक नियमांचं उल्लंघन करतात आणि त्यामुळे अशा घटनासमोर येतात.
हेही वाचा